अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाल्याने ‘अहिल्यानगर महाकरंडक’ अशा नव्या नावाने होणारा हा पहिलाच सोहळा होता. आपल्या सर्वांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५१ वर्षे पूर्ण झाली. हा केवळ इतिहासातील एक क्षण नाही, तर अखंड मराठीजनांच्या जाज्वल्य अभिमानाचा तो एक जिवंत आणि सळसळता झरा आहे. तोच अभिमान, तीच प्रेरणा आणि तोच ऐतिहासिक वारसा उराशी बाळगून, महाराष्ट्राची ही सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहिल्यानगर महाकरंडक’ पूर्णपणे ‘शिवकालीन’ वातावरणात आणि स्वरूपात रंगली.